
Last Updated on December 5, 2022 by Jyoti S.
नरेंद्रसिंह तोमर : नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून, नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यास खर्च कमी होतोच, शिवाय उत्पादनाला अधिक चांगला भाव मिळतो, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे. यापुढे नैसर्गिक शेती हा कृषी शिक्षणाचा भाग असेल, लवकरच येत्या काळात कृषी शिक्षण अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती पद्धतींचा समावेश करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत,असेही त्यांनी सांगितले.
ग्वाल्हेरमध्ये आयोजित नैसर्गिक शेतीविषयक कार्यशाळेला त्यांनी संबोधित केले. कृषी तंत्रज्ञान उपयोजना संशोधन संस्था (एटीआरी), जबलपूर आणि राजमाता विजयाराजे शिंदे कृषी विद्यापीठ, ग्वाल्हेर यांनी संयुक्तपणे या कार्यशाळेचे आयोजन केले होते. तोमर हे या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. एके काळी भारतामध्ये देशात लोकसंख्येच्या तुलनेत अन्नधान्याची खूप मोठी कमतरता होती. त्या वेळी उत्पादन केंद्री धोरणं आखून रासायनिक खतांच्या वापराच्या दिशेने आपण वाटचाल सुरू केली. ज्यामुळे अन्नधान्यांचे उत्पादन वाढले, आणि सद्यस्थितीत आपण अन्नधान्याचे अतिरिक्त उत्पादन घेऊ लागलो आहोत, पण आता आपल्याला स्वतः पुन्हा एकदा बदल घडवून आणण्याची गरज निर्माण झाली आहे, जेणेकरून भविष्यातील अन्नधान्य पुरवठ्याची सुनिश्चिती करता येईल आणि निसर्गासोबतचा समतोलही राखता येईल, ही केवळ भारतासाठीच नाही तर जगासमोरचीही चिंता आहे, असे त्यांनी सांगितले.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
सद्यस्थितीत आपल्याला निरोगी मन, सकस आहार, आणि निरोगी शेती आणि सुदृढ मानवजाती या तत्त्वांचे पालन करण्याची गरज आहे आणि यासाठीच आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला हवे,असे ते म्हणाले.

केंद्र सरकार इतर उपाययोजनांसोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठीही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. यादृष्टीनेच सरकारने पिकांसाठीच्या किमान आधारभूत किमतींमध्ये सुमारे दीडपट वाढ केली, त्यासोबतच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये इतकी रक्कम दिली जात आहे, अशाप्रकारच्या उपाययोजनांद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे कृषीमंत्री या वेळी म्हणाले.